श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा | Shri GuruCharitra Adhyay 18

अध्याय अठरावा
श्रीगणेशाय नमः । जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणीं। पूर्ण केला दातारा ।।१।।
गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां न धाय माझें मनु। कांक्षा होतसे अंतःकरणं । कथामृत ऐकावया ।।२।।
ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं । कथामृतसंजीवनीं। आणिक निरोपीं दातारा ।।३।।
येणेंपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तींसी । मस्तक ठेवी चरणांसी। कृपा भाकी तये वेळीं ।।४।।
शिष्यवचन ऐकोनि । संतोषले सिद्धमुनि । सांगतात विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्तें ।।५।।
ऐक शिष्यशिखामणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति गुरुचरणीं। तल्लीन झाली निश्चयें ।।६।।
तुजकरितां आम्हांसी। चेतन झालें परियेसीं । गुरुचरित्र आद्यंतेंसी । स्मरण जाहलें अवधारा ।।७।।
भिल्लवडीस्थानमहिमा । निरोपिलें अनुपमा। पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ।।८।।
क्वचित्काळ तये स्थानीं। श्रीगुरु होते गौप्य होवोनि । प्रकट झाले म्हणोनि । पुढें निघाले परियेसा ।।९।।
वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत । श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ।।१०।।
पुढें कृष्णा प्रवाहांत। श्रीगुरु तीर्थं पावन करीत। पंचगंगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दें ।।११।।
अनुपम तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर । प्रयाग मानस तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ।।१२।।
कुरवपूर ग्राम गहन । कुरुक्षेत्र तेंचि जाण । पंचगंगाकृष्णासंगम । अति उत्तम परियेसा ।।१३।।
कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य । तयाहुनी अधिक जाण । तीर्थे असती अगम्य । म्हणोनि राहिले श्रीगुरु ।।१४।।
पंचगंगानदीतीरीं। प्रख्यात असे पुराणांतरीं। पांच नामें आहेत थोरी। सांगेन ऐक एकचित्तें ।।१५।।
शिवा भद्रा भोगावती। कुंभीनदी सरस्वती। पंचगंगा नामें ख्याति । महापातकें संहारिती ।।१६।।
ऐशा प्रख्यात पंचगंगा । आल्या कृष्णेचिया संगा। प्रयागाहुनी असे चांगा। संगमस्थान मनोहर ।।१७।।
अमरपुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम । जैसा प्रयागसंगम । तैसे स्थान मनोहर ।।१८।।
वृक्ष असे औदुंबरू । प्रख्यात जाणा कल्पतरू । देव असे अमरेश्वरू। तया संगमीं जाण पां ।।१९।।
जैसी वाराणसी पुरी । गंगाभागीरथी सरी। पंचनदीसंगम थोरी। तत्समान असे परियेसा ।।२०।।
अमरेश्वरसन्निधानीं। वसती चौसष्ट योगिनी। शक्तितीर्थ निर्गुणी । प्रख्यात असे परियेसा ।।२१।।
अमरेश्वरलिंग बरवें । तयासी वंदोनि स्वभावें। पूजितां नरें अमर व्हावें । विश्वनाथ तोचि जाणा ।।२२।।
प्रयागीं करितां माघस्नान । जें पुण्य होय साधन । शतगुण होय त्याहून । एक स्नानें परियेसा ।।२३।।
सहजनदीसंगमांत । प्रयागसमान विख्यात । अमरेश्वर परब्रह्म सत्य । तया स्थानीं वसतसे ।।२४।।
या कारणें तया स्थानीं । कोटितीर्थं असती निर्गुणी। वाहे गंगा दक्षिणी। वेणीसहित निरंतर ।।२५।।
अमित तीर्थे तया स्थानीं । सांगतां विस्तार पुराणीं । अष्ट तीर्थं असती गुणी । तया कृष्णाप्रवाहांत ।। २६ ।।
उत्तर दिशे असे देखा । वाहे कृष्णा पश्चिममुखा । शुक्लतीर्थ नाम ऐका । ब्रह्महत्यापापें जाती ।।२७।।
औदुंबरसन्निधेसी । तीन तीर्थं परियेसीं । एकाहूनि एक अधिकेसी । तीर्थे असती मनोहर ।। २८ ।।
पापविनाशी काम्य तीर्थ । तिसरें सिद्धवरद तीर्थ । अमरेश्वरसन्निधार्थ । अनुपम तीर्थे असती पैं ।।२९।।
पुढें संगमषट्कुळांत । प्रयागतीर्थ असे ख्यात । शक्तितीर्थ अमरतीर्थ । कोटितीर्थ परियेसा ।। ३० ।।
तीर्थं असती अपारी। सांगतां असे विस्तारी। या कारणें श्रीगुरु त्या पुरीं । राहिले तेथें द्वादशाब्दें ।। ३१।।
कृष्णा वेणी नदी दोनी। पंचगंगा मिळोनि । सप्तगंगासंगम सगुणी। काय सांगों महिमा त्याचा ।।३२।।
ब्रह्महत्यादि पातकें। जळोनि जाती स्नानें एकें। ऐसें सिद्धस्थान निकें। सकळाभीष्ट होतीं तेथें ।। ३३।।
काय सांगों त्यांचा महिमा। आणिक द्यावया नाहीं उपमा। दर्शनमात्रं होती काम्या । स्नानफळ काय वर्णं ।।३४।।
साक्षात् जाणा कल्पतरू । वृक्ष असे औदुंबरू। गौप्य होतां अगोचरू। राहिले श्रीगुरु तये स्थानीं ।। ३५ ।।
भक्तजनतारणार्थ। होणार असे तीर्थ प्रख्यात । राहिले तेथें श्रीगुरुनाथ । म्हणोनि प्रकट जाहले ।। ३६ ।।
असतां पुढें वर्तमानीं । भिक्षा करावया प्रतिदिनीं । अमरापुर म्हणिजे ग्रामीं। जाती श्रीगुरू परियेसा ।। ३७।।
तया ग्रामीं द्विज एक । असे वेदाभ्यासक । भार्या त्याची पतिसेवक । पतिव्रताशिरोमणी ।। ३८ ।।
सुशीळ असे ब्राह्मण। शुष्क भिक्षा करी आपण। कर्ममार्ग-आचरण । असे सात्त्विक वृत्तीनें ।। ३९ ।।
तया विप्रमंदिरांत । असे वेल उन्नत । शेंगा निघती नित्य बहुत । त्याणें उदरपूर्ति करी ।।४०।।
एखाद्या दिवशीं ब्राह्मणासी। चरु न मिळे परियेसीं। तया शेंगा रांधोनि हर्षी । दिवस क्रमी येणेंपरी ।।४१।।
ऐसा ब्राह्मण दरिद्री । याचकवृत्तीं उदर भरी। पंचमहायज्ञ कुसरी। अतिथी पूजी भक्तीनें ।।४२।।
भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । पूजा करी नेमासी। घेवड्याच्या शेंगा परियेसीं। करीं शाखनैवेद्या ।।४३।।
वर्ततां श्रीगुरु एके दिवसीं । तया विप्रमंदिरासी। गेले आपण भिक्षेसी। नेलें विप्रं भक्तीनें ।।४४।।
भिक्षा करून ब्राह्मणासी । आश्वासिती अतिसंतोषीं । गेले तुझे दरिद्रदोष । म्हणोनि निघती तये वेळीं ।।४५।।
तया विप्रगृहांत । जो कां होता वेल उन्नत । घेवडा नामें विख्यात । आंगम सर्व वेष्टिलें ।।४६।।
तया वेलाचें बुडमूळ । श्रीगुरु छेदिती तात्काळ । टाकोनि देती समूळ । गेले आपण संगमासी ।।४७।।
विप्रवनिता तये वेळीं । दुःख करिती पुत्र सकळीं। म्हणती पहा हो दैव बळी। कैसें देवें केलें आम्हां ।।४८।।
आम्हीं तया यतीश्वरासी । काय उपद्रव केला त्यासी। छेदिलें आमुच्या ग्रासासी । टाकोनि दिलें भूमीवरी ।।४९।।
ऐशापरी ती नारी। दुःख करी अनिवारी। पुरुष तिचा कोपें वरी। म्हणे प्रारब्ध प्रमाण ।।५०।।
भ्रतार म्हणे तये वेळीं। जें होणार जया काळीं । निमित्य करी चंद्रमौळी। तया आधीन विश्व जाण ।।५१।।
विश्वव्यापक नारायण । उत्पत्तिस्थितिलयकारण। पिपीलिकादि स्थूल जीवन । समस्तां आहार करीतसे ।।५२।।
आयुरन्नं प्रयच्छति । ऐसें बोल वेदश्रुति। पंचानना आहार हस्तीं। केवी करीतसे प्रत्यहीं ।।५३।।
चौऱ्यांयशी लक्ष जीवांसी । स्थूल सूक्ष्म समस्तांसी। निर्माण केलें आहारासी । उत्पत्ति केली तदनंतर ।।५४।।
रंका राया एक दृष्टीं । करूनि पोषितो हे सृष्टि । आमुचें प्रारब्ध असे वोखटी । तैसें फळ आपणासी ।। ५५।।
पूर्वजन्मीं निक्षेपण । सुकृत दुष्कृत असे जाण । भोगणें आपुलें आपण । पुढिलीयावरी काय बोल ।।५६।।
आपुलें दैव असतां उणें । पुढल्या बोलती मूर्खपणें । जें पेरिलें तें भक्षणें। कवण बोल सांगें मज ।।५७।।
बोल ठेविसी ईश्वरासी। आपलें अर्जित न विचारसी। ग्राम घेतला म्हणसी। अविद्यामाया वेष्टोनि ।।५८ ।।
तो तारक आम्हांसी। म्हणोनि आले भिक्षेसी। नेलें आमुच्या दरिद्रासी । तोचि तारी अंतीं आम्हां ।। ५९।।
येणेंपरी स्त्रियेसी । संबोधित परियेसीं । काढोनि वेल-शाखेसी। टाकिता झाला गंगेत ।।६०।।
तया वेलाचें मूळ जरी। जें कां होतें आपुल्या द्वारीं। टाकों म्हणूनि द्विजवरीं। खणिता झाला त्या काळीं ।। ६१।।
काढितां वेलमूळासी । लागला कुंभ निधानेसी । आनंद झाला बहुवसी । घेवोनि गेला घरांत ।। ६२।।
म्हणे नवल प्रवर्तलें । यतीश्वर प्रसन्न झाले। म्हणोनि वेलासी तोडिलें । निधान लाधलें आम्हांसी ।।६३।।
नर नव्हे तो योगेश्वर। होय ईश्वरी अवतार । आम्हां भेटला दैन्यहर। म्हणती चला दर्शनासी ।।६४।।
जावोनि संगमीं गुरुपासीं । पूजा करिती भावेंसी। वृत्तान्त सांगितला तयासी । तये वेळीं हर्षयुक्त ।।६५।।
श्रीगुरु म्हणती तयासी। तुम्हीं हैं न सांगावें कवणासी। अखंड लक्ष्मी तुमचें वंशीं। आम्हां प्रगकतां जाईल ।। ६६ ।।
ऐशापरी द्विजासी । सांगती श्रीगुरू परियेसीं । सुखी असावें आपुल्या गृहासी । पुत्रपौत्रीं नांदावें ।। ६७।।
ऐसा वर लाधोन’ । गेला घरीं तो ब्राह्मण। श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रं दैन्य हरे ।। ६८ ।।
ज्यासी होईल गुरुकृपा । त्यासी कैचें दैन्य बापा । कल्पवृक्ष-आश्रय करितां । विघ्न कैचें तया घरीं ।। ६९।।
दैवें उणा असेल नरु। तेणें भजावा श्रीगुरु । तोचि पावेल पैलपारु । पूज्य होय सकळ लोकां ।। ७० ।।
जो कां भजेल श्रीगुरुतें । हि पर साधे तयातें। अखंड लक्ष्मी सदनातें । अष्टैश्वर्यं नांदती ।। ७१।।
सिद्ध म्हणे नामधारकासी। श्रीगुरुमहिमा आहे ऐसी । भजावें मनोभावेंसी । कामधेनु तुझें घरीं ।।७२।।
गंगाधराचा नंदन । सांगे श्रीगुरुचरित्र विस्तारोन । पुढील कथा अमृतपान । ऐका श्रोते हो एकचित्तें ।। ७३।।
इति श्रीगुरुचरित्रामृत । विवेकसार अयाचित । विप्रदैन्यहरयेथ । कथा निरोपिली ।। ७४।।
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे विवेकसारअयाचितविप्रदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः ।।१८।। श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पितमस्तु ।। शुभं भवतु ।। ओवीसंख्या ।।७४।।
।। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।
।। अध्याय अठरावा ।। * ।। ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले ।।
श्रीगणेशाय नमः ।। नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, “महाराज, श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा.” भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्रीगुरू कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा-वरुणा संगमावर गेले. तेथून पुढे कृष्णा-पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत. हे संगमक्षेत्र ‘दक्षिण वाराणसी’ म्हणून प्रख्यात आहे. याचे माहात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जिवाला अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. येथे चौसष्ट योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम षट्कुळात शुक्लतीर्थ, पापविनाशीतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटितीर्थ अशी आठ तीर्थे आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनःकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो.
या कृष्ण-पंचगंगा संगमावर श्रीगुरू काही काळ गुप्त रूपाने (सामान्य यतिरूपात) राहिले. त्यानंतर त्यांचे माहात्म्य लोकांत प्रकट झाले. कसे ते सांगतो – पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. श्रीगुरू तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्त्विक, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन-पोषण करायचा. त्याची पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता खी होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायची.
एके दिवशी श्रीगुरू भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले. या सेवेने श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघूनही गेले.
श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली, म्हणाली, “अरेरे । काय हे दुर्दैव ! त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले !” हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागावून म्हणाला, “यतीश्वरांना दोष देऊ नकोस, सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. पूर्वजन्मी आपण जी काही बरीवाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुख-दुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते ! मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य । त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही.’
त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे ? म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली. तर काय आश्चर्य ! त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘श्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले ! त्यांनी आमचे दैन्य घालविले ते ईश्वरी अवतार आहेत !’ असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जयजयकार करू लागली.
त्यानंतर ते दांपत्य संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, “या घटनेची कोठेही वाच्यता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल.” ते ऐकून ते दांपत्य धन्य झाले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले.
नामधारका ! ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही, त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते. भक्ताचे कल्याण होते.”
Keyword – gurucharitra adhyay 18 , gurucharitra adhyay 18 pdf , gurucharitra 18 adhyay , gurucharitra 18 va adhyay , shri gurucharitra adhyay 18 , gurucharitra 18 adhyay in marathi , 18 adhyay gurucharitra , 18 va adhyay gurucharitra , gurucharitra adhyay 18 marathi , gurucharitra adhyay 18 pdf download , shri guru charitra adhyay 18 pdf in marathi, download guru charitra adhyay 18 in marathi